खानदेश केटरिंग असोसिएशनची माहिती
जळगाव (प्रतिनिधी):- खानदेश केटरिंग असोसिएशनने कर्मचाऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे ठरवले आहे. येत्या काळात रात्री १२ वाजेनंतर केटरिंग सेवा न देण्याचा प्रस्ताव असोसिएशनकडून मांडण्यात आला असून, यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

निर्णयामागची मुख्य कारणे
असोसिएशनच्या मते, सध्या रात्रीचे कार्यक्रम उशिरापर्यंत म्हणजे पहाटे २ ते ३ वाजेपर्यंत चालतात. यामुळे कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्राम मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत काम केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून कामावर हजर राहावे लागते. या सततच्या कामामुळे कामगारांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत.
अपुऱ्या झोपेत प्रवास आणि काम केल्यामुळे अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. केवळ जळगाव जिल्ह्यात केटरिंग व्यवसायावर २०,००० हून अधिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा ठरत आहे.
गुढीपाडव्याला होणार औपचारिक घोषणा
या प्रस्तावाबाबत असोसिएशनची भूमिका स्पष्ट असून, आगामी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या निर्णयाचा औपचारिक प्रस्ताव पारित केला जाणार आहे. ही माहिती असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष रतन सारस्वत, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश टाटिया, जळगाव शहराध्यक्ष सत्यनारायण जोशी, उपाध्यक्ष गोपाल अग्रवाल, सचिव महेंद्र टाडा, कोषाध्यक्ष गोपाल व्यास, मुख्य सल्लागार राजेंद्र वैष्णव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे केटरिंग क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो कामगारांना दिलासा मिळणार आहे.









