मुंबईला मागे टाकत वसूल केला ६८.८६ कोटींचा दंड
भुसावळ ( प्रतिनिधी ) – मध्य रेल्वेने अनधिकृत आणि विनातिकीट प्रवाशांविरुद्ध आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उघडलेल्या मोहिमेत भुसावळ विभागाने अत्यंत प्रभावी कामगिरी केली आहे. एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या १० महिन्यांच्या कालावधीत भुसावळ विभागाने तिकीट तपासणीत मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये सर्वाधिक दंड वसुलीचा विक्रम प्रस्थापित केला आहे.

मध्य रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण झोनमध्ये एकूण २०३.७६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये भुसावळ विभागाने ८.१८ लाख प्रकरणांमध्ये तब्बल ६८.८६ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या मुंबई विभागालाही (६२.७३ कोटी) भुसावळ विभागाने दंड वसुलीच्या बाबतीत मागे टाकले आहे. संपूर्ण मध्य रेल्वेचा विचार करता, एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान ३४.३४ लाख विनातिकीट प्रवासी पकडले गेले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ९.८% जास्त आहेत. जानेवारी २०२६ या एका महिन्यातच मध्य रेल्वेने २०.६० कोटी रुपये दंड वसूल केला, जो गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या तुलनेत ३२% जास्त आहे.
या कालावधीत मुंबई विभागात १४.५१ लाख प्रकरणांत ६२.७३ कोटी रुपये, पुणे विभागात ३.८४ लाख प्रकरणांत २३.७३ कोटी रुपये, नागपूर विभागात ३.६८ लाख प्रकरणांत २२.९१ कोटी रुपये, सोलापूर विभागात २.०६ लाख प्रकरणांत ९.४६ कोटी रुपये आणि मुख्यालय स्तरावर १६.०६ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
भुसावळ विभागातून जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी पथकांनी अॅम्बुश तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहीम राबवून ही कारवाई केली आहे. प्रवाशांना सुरक्षित आणि सन्माननीय प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी ही मोहीम राबवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वे बुकिंग काउंटर किंवा ‘रेल वन’ ॲपवरून अधिकृत तिकीट काढूनच प्रवास करावा. बनावट तिकीट तयार करणे किंवा त्यावर प्रवास करणे हा भारतीय न्याय संहिता कायदा २०२३ अंतर्गत गंभीर गुन्हा असून, यासाठी दंड आणि ७ वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. ‘सुरक्षित प्रवास करा, जबाबदारीने प्रवास करा’ असा संदेश रेल्वे प्रशासनाने या माध्यमातून दिला आहे.









