जळगाव शहरातील गोलाणी मार्केट येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केट येथे मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास २ मोबाईल दुकानांना भीषण आग लागल्याने खळबळ उडाली. घटनेमध्ये दुकानांचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झालेले असून अग्निशामक दलाच्या एका बंबाने ही आग विझवली.

गोलाणी मार्केटमध्ये तळमजल्यावर वाहेगुरू मोबाईल आणि त्याच्या शेजारी तिरुमाला इंटरप्राईजेस अशी दोन दुकान आहेत. रात्री १२ वाजेच्या सुमारास शॉट सर्किटमुळे अचानक दुकानात आग लागली. तेथे उपस्थित असलेले महेश पाटील यांनी अग्निशमन दलाला याबाबत माहिती कळवली. आगीमध्ये दुकानातील फर्निचर आणि इतर साहित्य तसेच मोबाईल, मोबाईलचे साहित्य व फर्निचर असा सर्व मुद्देमाल जळून खाक झाला आहे. दुकान मालक बंटी शर्मा यांना माहिती मिळत असताना दुकानाकडे धाव घेतली. मात्र रस्त्यात त्यांची दुचाकी घसरून अपघात झाला.

वाहेगुरु मोबाईल्स हे बंटी शर्मा, सुनील शर्मा व विकी शर्मा असे तीन भाऊ चालवत होते. सदर आग विझविण्याकामी महानगरपालिकेचे वाहनचालक संतोष तायडे, फायरमन रोहिदास चौधरी, ऋषभ सुरवाडे, यश मनोरे, गणेश महाजन, चेतन सपकाळे आदींनी परिश्रम घेतले. तात्काळ नागरिकांनी धाव घेतल्यामुळे इतर दुकानांना आगीची झळ पोचली नाही. दरम्यान या घटनेमुळे दुकान मालकांना मोठा धक्का बसला आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.









