जळगावात दुसरी घटना : छत्रपती शिवाजीनगरात नागरिकांचा संताप
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण स्मशानभूमीतून एका वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी गेल्याचा प्रकार घडल्यावर आता पुन्हा सोमवारी आठवड्याभराने एका महिलेच्या अस्थी चोरी झाल्याची घटना छत्रपती शिवाजीनगरातील स्मशानभूमीत उघडकीस आली आहे. दरम्यान, झालेल्या या प्रकारामुळे महिलेच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. तर आ. राजूमामा भोळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मनपाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर येथील जिजाबाई पाटील यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर शिवाजीनगर स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला होता. आज सकाळच्या सुमारास त्यांच्या नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता त्यांना स्मशानभूमीतून अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या ठिकाणी डोक्याच्या आणि पायाच्या भागातील राखेसह अस्थी नसल्याचं निदर्शनास आले. मयत जिजाबाई पाटील यांच्या अंगावरील चार ग्रॅम सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गायब केले असून, यामुळे नातेवाईकांकडून संताप व्यक्त होत आहे. चोरट्यांनी दागिने लंपास केले आहे. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी पंचपक्वान्न असलेले भोजनाचे पान ठेवण्यात आल्याचं आढळलं आहे.
अशीच एक घटना आठवड्यापूर्वी मेहरून स्मशानभूमीत देखील घडली होती, मात्र एका आठवड्यात ही दुसरी घटना असून पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन अजूनही झोपलेले आहे का? असा सवाल नातेवाईकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेच्या कारभारावर आमदार सुरेश भोळे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीत सीसीटीव्ही बसवण्याबाबत आधीच मनपा प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. मात्र अद्याप काम झालेलं नाही. त्यामुळे आज सोमवारी याबाबत मनपा आयुक्त यांना जाब विचारणार असल्याचे आमदार भोळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.