रिंगणगावच्या ग्रामस्थांनी विचारला भाजपच्या खासदारांना जाब
जळगाव (प्रतिनिधी) :- एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १३ वर्षीय तेजस महाजन या मुलाचा १३ दिवसांपूर्वी निर्घृणपणे खून करण्यात आला होता. खूनप्रकरणी आज शुक्रवारी दि. २७ जून रोजी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत रोष व्यक्त केला. दरम्यान, यावेळी मोर्चात आलेल्या भाजपच्या खासदार स्मिता वाघ यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरल्याचे यावेळी पाहायला मिळाले.
जिल्हाधिकारी कार्यालयावर जेव्हा मोर्चा आला तेव्हा ग्रामस्थांना गेटवरच पोलिसांनी अडविले. त्यात काही ग्रामस्थांना खा. स्मिता वाघ या मोर्चात सहभागी झाल्याचे दिसून आले. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात खा. वाघ यांना ग्रामस्थांनी जाब विचारला. घटना घडून गेली १३ दिवस झाले, आतापर्यंत कोठे होते आपण ? आता का आले मोर्चात आमच्या ? असे परखड सवाल करून खा. वाघ यांना धारेवर धरले. यावेळी खा. वाघ यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या थातुरमातुर उत्तरांनी ग्रामस्थांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.
अॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करावी, प्रकरण फास्टट्रॅक न्यायालयात चालवावे, नरबळीचे कलम लावावे, तपास सीआयडीकडे सोपवावा अशा मागण्या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे प्रशासनासमोर मांडल्या.या प्रकरणी काही व्यक्तींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, पोलिस नरबळीच्या शक्यतेला महत्त्व देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.