नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका हत्तीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर, सर्वच स्तरातून संताप व्यक्त व्हायला लागला. अखेरीस केरळ सरकारने पावले उचलत पोलीस आणि वन-विभागातर्फे मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी खास ऑपरेशन आखले . आणि या प्रयत्नांना अखेरीस यश आले आहे. कारण याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे. केरळ वन-विभागाने या कारवाईविषयी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली. दरम्यान या आरोपीचे नाव व इतर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तरीही हत्तीणीच्या मृत्यूनंतर सरकारी यंत्रणांना मिळालेले हे पहिले यश मानले जात आहे.
२७ मे रोजी या हत्तीणीने वेलियार नदीत आपला अखेरचा श्वास घेतला. वन-अधिकारी मोहन क्रिश्नन यांच्या फेसबूक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली होती. यानंतर केरळ सरकारने घटनेची दखल घेत, मारेकऱ्यांना अटक करण्याचं आश्वासन दिलं होतं.