चाळीसगाव तालुक्यात उंबरखेड येथील घटना, पुण्याच्या दाम्पत्यावर गुन्हा दाखल
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील उंबरखेड येथील तरूणाला मुंबई महापालिकेत अग्नीशमन विभागात नोकरी लावून देतो असे सांगून ३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिजीत सुभाष कुंभारे (वय ३० रा. उंबरखेडा ता.चाळीसगाव) हा तरूण कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दि. १४ मे २०२३ रोजी त्यांची ओळख रीया रिशीकुमार पाटील आणि रिशीकुमार पाटील यांच्याशी झाली. त्या दोघांनी अभिजित कुंभारे याला मुंबई महापालिकेत अग्नीशमन विभागात नोकरी लावून देतो असे सांगून वेळीवेळी पैसे मागितले. त्यानुसार अभिजितने दोघांना वेळोवेळी एकुण ३ लाख रूपये दिले. त्यानंतर नोकरी लावून न देता फसवणूक केली. दरम्यान फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात रीया रिशीकुमार पाटील आणि रिशीकुमार पाटील (दोन्ही रा. पुणे चिंचवड) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.