जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – चारा घेण्यासाठी जात असल्याचे सांगून शेतात गेलेल्या पशूपालकाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी दि. ४ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भरत रतन वाघ (३०, रा. बिलवाडी, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे.(केसीएन) कर्जाचे ओझे वाढत गेल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. रतन वाघ यांचा दुग्धव्यवसाय आहे. बचत गटासह पतसंस्थेकडून कर्ज काढून त्यांनी म्हशी खरेदी केल्या होत्या. मात्र त्यातून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने ते चिंतेत होते. रविवारी वाघ हे गुरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेले होते.
तेथे त्यांनी झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. हा प्रकार काहींना दिसताच त्यांनी ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









