सीईओंची संकल्पना : पालकमंत्र्यांच्या हस्ते बिलवाडीच्या गटाला पूर्व संमती
जळगांव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने ग्रामिण शेतकरी महिलांना आर्थिक स्वावलंबन व रोजगार निर्मितीच्या उद्देशाने जिल्हा परिषद सेस निधीतुन रु.५० लक्ष निधी हा सुक्ष्म अन्न प्रक्रिया विशेष योजनेमधून उपलब्ध करुन दिला आहे. दि. १ मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात जळगाव तालुक्यातील बिलवाडी येथील रघुवीर समर्थ महिला शेतकरी गटाच्या सदस्यांना पापड व डाळ उद्योगाकरीता पुर्व संमती देण्यात आली.
या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अति.मु.का.अ. रणधीर सोमवंशी आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजु लोखंडे, कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के हे उपस्थित होते. महिला बचत गटात काम करणाऱ्या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा व महिला आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण आणि सक्षम व्हाव्यात यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ही योजना आखण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाच्या निधीतून २५ बचत गटांना ५० लक्ष रुपये इतक्या निधीच्या माध्यमातून अन्न प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक असलेले पापड मशीन, डाळ मिल, लाकडी तेल घाणा यासह इतर पूरक साधने पुरविण्यात येणार आहेत. या सोबतच जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना अधिक कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने रु. ५५ लक्ष हे शेतकरी उत्पादक कंपनीसाठी ड्रोन खरेदी करता उपलब्ध केले आहेत तर जिवामृत स्लरी फिल्टरकरीता रु.१२ लक्ष उपलब्ध करुन दिले आहेत.