जळगाव तालुक्यातील किनोद गावातील घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील किनोद येथील २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दि. १ मे रोजी रात्री समोर आली आहे. दरम्यान ही आत्महत्या नसून विवाहितेची सासू आणि ननंद यांनी तिचा गळा दाबून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
गायत्री ज्ञानेश्वर कोळी (वय २६ रा. किनोद ता. जळगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे. किनोद गावात तिचे पती, मुलगा ध्रुव (वय ५), मुलगी नियती (वय ७) सासू यांच्यासह वास्तव्याला होत्या. पती भाजीपाला विक्री करतात तर संसाराला हातभार लावण्यासाठी गायत्री शिवणकाम काम करत होत्या. (केसीएन)गुरुवारी दिनांक १ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत गायत्रीच्या माहेरच्या मंडळींना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गायत्रीने आत्महत्या केली नसून तिच्यासोबत घातपात झाल्याचा आरोप तिचा भाऊ सागर कोळी, बहीण प्रियंका कोळी आणि मावशी सुनीता कोळी यांनी केला आहे.
दरम्यान, गायत्रीने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर तिचे पती, सासू आणि नणंद हे फरार झाले होते. गायत्रीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.(केसीएन)यावेळी तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले. ही आत्महत्या नसून तिचा खून करण्यात आला आहे असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला असून दोषींवर गुन्हा होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला होता. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.