राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निर्णय
जळगाव ( प्रतिनिधी ) – आयकर हा ज्याप्रमाणे देशाच्या विकासासाठी अतिशय महत्वाचा ठरतो त्याचप्रमाणे काही वेळेस अपघाती निधनानंतर नुकसान भरपाई मिळण्याकामी देखील भरपुर महत्वाचा ठरतो.
दि. १८ जून २०२२ रोजी प्रमोद दत्तू पाटील, रा. पहाण, ता. पाचोरा यांचा पाचोरा पोलीस स्टेशन हद्दीत रस्ता अपघात झाला होता. अपघाताचेवेळी ते त्यांची मोटार सायकल क.MH-19 AH-5293 या मोटार सायकलीने पाचोरा येथे जात असतांना विरुध्द दिशेने येणारी कूझर कार क. MH-20 BY-2933 यावरील गाडी चालकाने निष्काळजीपणाने भरधाव वेगाने येत प्रमोद पाटील चालवित असलेल्या मोटारसायकलीस समोरुन जोरात ठोस मारली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी जखमींना ताबडतोब पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषीत केले.
अपघातानंतर सामनेवाला कूझर चालक महेंद्र सुरेश अहिरे यांच्यावर भा.दं.वि कलम ३०४ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व सदर गुन्हयाच्या चौकशीकामी चालक महेंद्र अहिरे यांना पाचोरा पोलीस स्टेशन यांनी ताब्यात घेतले व अपघाताला जबाबदार कूझर गाडी देखील जप्त केली. सदर अपघातावेळी आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याकामी मयताची पत्नी वनिता प्रमोद पाटील, मुलगी प्रिती प्रमोद पाटील, मुलगा कृष्णल प्रमोद पाटील तसेच मयताचे आईवडील यांनी मोटार अपघात दावा प्राधिकरण, जळगाव येथे नुकसान भरपाई अर्ज दाखल केला.
सदरचा दावा हा सामनेवाला गाडी चालक महेंद्र सुरेश अहिरे गाडी मालक व सामनेवाला गाडीची विमा कंपनी लिबर्टी जनरल इन्शुरन्स कं. लि. यांचेविरुध्द दाखल करण्यात आला होता. सदर अपघातात नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्याकरीता आवश्यक पुरावे हे अर्जदाराच्या वकीलांनी न्यायालयासमोर मांडले. मयत हे पशुखाद्याच्या व्यवसाय करीत असल्याने ते नियमितपणे आयकर भरत होते. मयताने अपघाताच्या दोन वर्षांपूर्वी आयकर भरला असल्याने आयकर जोडपत्रात मयताचे उत्पन्न हे निष्पन्न झाले होते. सदर उत्पन्नाला अनुसरुन व सर्वोच्च न्यायालयाने ठरवलेल्या प्रमाणास अनुसरुन नुकसान भरपाईची रक्कम स्पष्ट झाली होती.
सदर रक्कम ही दोन्ही पक्षांना मान्य असल्याने चर्चेअंती अर्जदाराना रु.४१ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. सदर दाव्यात मयत भरत असलेला आयकर हा सर्वात महत्वाचा पुरावा ठरला. सदर आयकर वर नमूद असलेल्या उत्पन्नाला अनुसरुन नुकसान भरपाई रक्कम ही निश्चित करण्यात आली.
त्यामुळे आयकर हा केवळ देशाच्या विकासासाठी नव्हे तर करदात्याच्या अपघाती निधनानंतर नुकसान भरपाई ची रक्कम ठरविण्याकरीता देखील अति महत्वाचा दस्तऐवज ठरतो. याचा अनुभव व बोध या दाव्यातून घेण्यासारखा आहे एकंदरीत यदा कदाचित अशा प्रकारच्या नुकसान भरपाई दाव्यांमध्ये एखाद्या व्यक्तीची अपघाती निधनाबाबत नुकसान भरपाई रक्कम ठरविण्याची वेळ येते, तर ती केवळ १२ ते १५ लाख ठरली असती, परंतु मयत हा नियमितपणे आयकर भरत असल्याने आज रोजी मयताच्या कुटूंबाला त्यांच्या भविष्याच्या उदरनिर्वाहाची रु.४१ लाखांची नुकसान भरपाई देण्याचे निश्चित झाले. अर्जदारांना समाधानकारक नुकसान भरपाई मिळाल्यामुळे अर्जदारांनी लोकन्यायालयाचे पैनल अध्यक्ष शरद पवार यांचे आभार मानले. सदर दाव्यात अर्जदारातर्फे अॅड. महेंद्र सोमा चौधरी, अॅड. श्रेयस चौधरी, अॅड. हेमंत जाधव, अॅड. सुनील चव्हाण आदींनी काम पाहीले.