नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – शेतकर्यांना नवीन मार्ग मिळाला आहे. बऱ्याच विचारविनिमयानंतर भारताच्या संसदेने कृषी कायद्यांना ठोस आकार दिला. या सुधारणांमुळे शेतकरी बंधनमुक्त होणार असून, नवीन हक्क, नवीन संधीही शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलत होते. पंतप्रधानांनी या कार्यक्रमात कृषी कायद्याला होत असलेला विरोध, कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. मी एक चांगली बातमी सांगत आहे. आई अन्नपूर्णा देवीची मूर्ती कॅनडाहून परत आणण्यात आली आहे. याबद्दल मी कॅनडा सरकारचे आभार मानतो, असंसुद्धा मोदींनी अधोरेखित केलं आहे.
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी संपू लागल्या आहेत. मोदींनी महाराष्ट्राच्या जितेंद्रचा उल्लेख केला. त्याने मक्याची शेती केली आहे. व्यापा-यांनी त्याची किंमत 3 लाख 32 हजार निश्चित केली होती. त्याला 25 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही मिळाला. परंतु उर्वरित पैसे चार महिन्यांपर्यंत दिले गेले नाहीत. त्यानंतर जितेंद्रने नव्या कायद्याच्या मदतीने सर्व पैसे मिळवले, असा उल्लेखही मोदींनी केला आहे.
नव्या कायद्यांतर्गत पीक खरेदीनंतर शेतकऱ्याला तीन दिवसांत पूर्ण पैसे द्यावे लागतात. जर तसे केले नाही तर तक्रार दाखल करता येते. एसडीएमलाही शेतकर्यांची तक्रार एका महिन्यात निकाली काढावी लागणार असल्याचंही मोदींनी सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 नोव्हेंबरला होणाऱ्या गुरुनानक देव यांच्या 551व्या प्रकाश पर्वाचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, गुरुग्रंथ साहिबमध्ये असे म्हटले आहे की, ‘सेवक को सेवा बन आई’, म्हणजे सेवकाचे काम म्हणजे सेवा करणे. एक सेवक म्हणून आपल्याला खूप काही करण्याची संधी मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
कोरोना विषाणूच्या संकटाला तोंड देण्यासाठी लस तयार करण्याचे काम जगभरात सुरू आहे. अनेक देशांमध्ये लसीचे काम अंतिम टप्प्यात आहे. भारतातही लस शोधण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पंतप्रधान मोदींनी शनिवारी देशातील 3 प्रमुख प्रयोगशाळांना भेट देऊन तेथील लसीची माहिती घेतली. पंतप्रधान मोदींनी कोरोना लसीच्या आधारे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे भेट दिली होती.







