नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नारळाची शेती करणाऱ्या शेतकर्यांना केंद्र सरकारकडून एमएसपीची भेट देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नारळ उत्पादक शेतकर्यांना सरकारच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, नारळाची एमएसपी (MSP) वाढविण्यात आली आहे. नारळाच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही किंमत प्रतिक्विंटल 9 हजार 960 रुपये होती, आता ती वाढून 10 हजार 335 रुपये इतकी झाली आहे.
प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही किंमत वाढवण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आला होता, त्यामुळे शेतकऱ्यांची 40 वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. जावडेकर यांनी यावेळी आरोप केला की, यूपीए सरकारने गेल्या कित्येक वर्षांमध्ये स्वामीनाथन आयोगाने दिलेल्या अहवालाची अंमलबजावणी केली नव्हती, परंतु मोदी सरकारने आता त्यासंबंधी पावलं उचलली आहेत.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या हिंसाचाराबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, दिल्ली पोलिसांकडून त्याबाबत सविस्तर चौकशी केली जाणार आहे. पत्रकारांनी वारंवार विचारल्यानंतरही प्रकाश जावडेकर याबाबतचे प्रश्न टाळत असल्याचे यावेळी दिसून आले.
कृषी कायद्यांविरोधात सातत्याने आंदोलनं होत आहेत, तसेच नवीन कृषी कायद्यांमुळे एमएसपी संपेल, असा आरोपही केला जात आहे. दरम्यान, मोदी सरकारने वारंवार आश्वासनं दिली आहेत की, एमएसपीची सुविधा पूर्वीसारखीच राहील. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकींमध्ये ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या इतर विषयांवर निर्णय घेण्यात आले आहेत.







