चाळीसगाव (प्रतिनिधी) – हरिद्वार येथे यात्रेसाठी जाणाऱ्या आई – वडिलांना रेल्वे गाडीत बसविल्यानंतर रेल्वे सुरु झाली. त्यामुळे घाई गडबडीत उतरत असतांना खाली पडून रेल्वेखाली सापडल्याने शिक्षक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली.
योगेश गंभीरराव पाटील (सूर्यवंशी) (वय ४१, रा. विवेकानंद कॉलनी, चाळीसगाव) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे या गावातील योगेश पाटील हे मूळचे रहिवासी आहेत. ते आई वडिलांसह चाळीसगाव शहरातील भडगाव रोडवरील विवेकानंद कॉलनीत वास्तव्यास होते. आपल्या वृद्ध आई वडिलांना हरिद्वारची यात्रा घडावी, यासाठी योगेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रवासाचे नियोजन केले होते. रेल्वेने जायचे असल्याने दादर अमृतसर या रेल्वे गाडीचे आरक्षण मिळाले होते. त्यानुसार गुरुवारी पहाटे योगेश पाटील हे त्यांच्या आई वडिलांना सोडण्यासाठी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर गेले. या ठिकाणी दादर अमृतसर या एक्स्प्रेसमध्ये योगेश पाटील यांनी आई वडिलांना बसविले. यादरम्यान सर्व सामान त्यांनी रेल्वेत ठेवले. आई वडिलांना व्यवस्थित जा, पोहोचलात की फोन करा, असं आई वडिलांना योगेश पाटील यांनी सांगितले.
आई वडिलांशी बोलत असतानाच रेल्वे सुरु झाली. काही वेळातच रेल्वेचा वेग वाढला. यादरम्यान योगेश पाटील हे घाईत रेल्वे गाडीतून उतरताना त्यांचा तोल गेला व खाली पडून ते रेल्वे गाडीत ओढले गेले. हा प्रकार प्लॅटफार्मवरील काही प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, पण काहीच उपयोग झाला नाही. योगेश पाटील यांचा गाडीखाली येऊन मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांनी पंचनामा करुन त्यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी चाळीसगाव रेल्वे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.