पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पाचोरा आणि भडगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या शेवटी म्हणजे (ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर) ऐन शेती मालाचे उत्पन्न हाती येण्याच्या वेळी कमी जास्त प्रमाणात पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे पिके पुर्णपणे नष्ट झाली होती. त्यामुळे मोठया आर्थिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते.
त्यात शेतकऱ्यांसमोर नव्याने उत्पन्नावाढीसाठी रब्बी हंगाम हाच एक पर्यांय असतांना काही ठिकाणी गहु, मका, हरबरा, सोयाबीन व बाजरी या पिकांची लागवड सुरु असून काही ठिकाणी लागवड पुर्ण झाली आहे. अशा परिस्थीतीत जमीनीला लागवडी योग्य करण्यासाठी व लागवड झालेल्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशी परिस्थिती असतांना शेतकऱ्यांच्या विहीरीत पाणी असुन देखील ते भरता येत नाही.
कारण कुठलीही पुर्व सुचना न देता महावितरणाकडुन शेतकऱ्यांच्या कृषी विज पंपांचे कनेक्शन तोडून सक्तीची विज बिल वसूली केली जात आहे. तसेच नादुरुस्त झालेल्या ट्रान्सफार्मर साठी पुन्हा – पुन्हा सक्तीचे विज बिल वसुल करुन देखील महिनाभर ट्रान्सफार्मर दुरुस्त करुन मिळत नाही.या सर्व समस्यांबाबत निवेदन दिले असल्याचे भाजपाचे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील थकबाकीसाठी शेतकऱ्यांच्या कृषीपंपाचे वीज कनेक्शन तोडू नये अशी नुकतीच सूचना दिलेली असतांना देखील जर शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जात असेल तर महावितरणाच्या विरोधात उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा अमोल शिंदे यांनी दिला.
याप्रसंगी भाजपा भडगाव तालुकाध्यक्ष अमोल पाटील, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस गोविंद शेलार, पंचायत समिती माजी सभापती बन्सीलाल पाटील, ओबीसी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, शहर सरचिटणीस दीपक माने, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, सरचिटणीस भैया ठाकूर, राहुल गायकवाड, रहीम बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.