पाचोरा ( प्रतिनिधी ) – येथील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त काल झालेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेत चाळीसगाव येथील पंकज रणदिवे यांनी “शिवराय- शिक्षण व संस्कार” या विषयावर विचार व्यक्त केले. शिवरायांचे फोटो, बॅनर तसेच पेहराव मिरवणे महत्त्वाचे नसून शिवरायांचे संस्कार व विचार आचरणात आणण्याची गरज आहे, असे मत पंकज रणदिवे यांनी व्यक्त केले.
पंकज रणदिवे यांनी स्वराज्याच्या राजमुद्रे वरील मजकुराचे विश्लेषण करताना सांगितले की, स्वराज्य स्थापन करतानाच लोककल्याणकारी राज्य निर्मितीचा महाराजांचा उद्देश होता, हे सिद्ध होते, स्वराज्य हे सर्वांचे राज्य आहे, ही भावना लोकांमध्ये निर्माण करून मी या राज्याचा उपभोगशून्य स्वामी आहे, हे आपल्या कर्तृत्वातून छत्रपतींनी सिद्ध केले आजच्या समाजापुढील आव्हाने वेगळी आहेत सद्य परिस्थितीतील युद्धाचे स्वरूप बदललेलं आहे. आता युद्धासाठी तलवार वापरायची नसून ज्ञान व पुस्तके हे युद्धाचं साधन आणि बुद्धी हे तंत्रज्ञान म्हणून वापरण्याची गरज आहे. आजच्या वातावरणात स्वराज्यातील व्यवस्था व प्रशासनाची आवश्यकता आहे.
धर्माचा अहंकार व अधिनिवेष असू नये हा महाराजांच्या संस्कृतीचा एक भाग होता हे स्पष्ट करताना रणदिवे म्हणाले की, अनेक दर्गाह आणि मशिदींसाठी महाराजांनी देणग्या दिलेल्या आहेत, ख्रिश्चन मिशनऱ्यांना मदत केलेली आहे. यावरून सर्व धर्मांप्रति समभाव सन्मानाची भावना महाराजांमध्ये दिसून येते.
अखिल भारतीय मराठा महासंघाचे पाचोरा तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आभार प्रकटन केले महासंघाचे चिटणीस चंद्रकांत पाटील यांनी व्याख्यानाचे सूत्रसंचालन केले या व्याख्यानाला शितल अकॅडमी व टायगर किड्सचे संचालक प्रा रोहन पाटील सर यांचे तंत्र सहाय्य लाभले.