पाचोरा (प्रतिनीधी) – केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावेत यासाठी दिल्ली येथे सुरु असलेल्या देशव्यापी आंदोलनास पाठींबा म्हणुन आज ३ डिसेंबर रोजी तहसिल कार्यालयासमोर पाचोरा शिवसेनेतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
याबाबत पाचोरा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे की, केंद्र सरकारने नुकतेच देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात ३ कायदे आपल्या पाशवी बहुमताच्या जोरावर मंजुर केले आहेत. सदरच्या कायद्यामुळे सामान्य शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असुन, अल्पभुधारक शेतकरी यामध्ये भरडुन निघणार आहेत. या कायद्यांना केंद्र सरकारने मागे घ्यावे यासाठी दिल्ली जवळ देशभरातील शेतकरी संघटना व शेतकरी एकवटुन गेल्या ८ दिवसापासुन आंदोलन करीत आहेत. मात्र या सरकारला शेतकऱ्यांच्या हिताविरुध्द भांडवलदारांचे घर भरण्यात आनंद आहे. त्याचा निषेध म्हणुन तसेच केंद्र सरकारने तातडीने सदरील तीन्ही कायदे तातडीने मागे घ्यावेत या मागणीसह पाचोरा तालुका शिवसेना – युवासेना, महिला आघाडी, शेतकरी सेना आज ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपासुन आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अँड. अभय पाटिल, माजी उपजिल्हा प्रमुख गणेश पाटिल, शेतकरी सेना जिल्हा प्रमुख अरूण पाटिल,पाचोरा तालुकाध्यक्ष शरद पाटिल, शहराध्यक्ष किशोर बारवकर, बंडु चौधरी, युवासेना जिल्हा समन्वयक सुरेश पाटिल व महिला आघाडी तालुका प्रमुख मंदाताई पाटील यांच्या स्वाक्षरी आहेत.








