जळगाव ( प्रतिनिधी ) – दोन दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ आणि आता जळगावात वाऱ्यामुळे केळी बागा आडव्या झाल्या आहेत. केळी तोडणीला आली असतानाच शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावल्याप्रमाणे सध्याची स्थिती आहे.
वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत खांब पडले आहेत अनेक गावचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची नामुष्की ओढावली आहे. पावसाची आवश्यकता असली तरी बदलत्या वातावरणामुळे नागरिक त्रस्त आहेत. केळी हे फळपिक असल्याची घोषणा मध्यंतरीच राज्य सरकारने केली होती. त्यामुळे आता नुकसानभरपाईत याचा काही उपयोग होईल का हे पहावे लागणार आहे.
हंगामाच्या सुरवातीला केळीच्या घटत्या दरामुळे शेतकरी चिंतेत होता. आता इतर फळपिके बाजारातून गायब होताच केळीला 2 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. जिल्ह्यात शेकडो एकरातील केळी बागा जमिनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका भडगाव, चोपडा, अमळनेर, या तालुक्यातील उत्पादकांना बसलेला आहे.
पावसापेक्षा वादळी वारे अधिक असल्याने नुकसान झाले आहे. अमळनेर तालुक्यात वाऱ्याने 15 घरांची पडझड झाली आहे. सुदैवाने जिवीत हानी झाली नसली तरी मोठे नुकसान झाले आहे. जनावरांची देखील जिवीतहानी झाली आहे. पंचनामे सुरू करण्यात आदेश देण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यात केळी हे मुख्य फळपिक आहे. नुकसान पाहण्यासाठी प्रशासकीय अधिकारी थेट बांधावर दाखल होत आहेत. केळीचा आता फळ पिकात समावेश केल्याने अधिकच्या प्रमाणात नुकासनभरपाई मिळेल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे.