नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – संसदेच्या जुन्या इमारतीने स्वातंत्र्योत्तर कालखंडात देशाला दिशादर्शन केले. तर नवीन इमारत देश ‘आत्मनिर्भर’ झालेला बघेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. संसदेच्या नवीन इमारतीचा शिलान्यास होण्याची घटना ही देशाच्या लोकशाही इतिहासातील मैलाचा दगड असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आणि शिलान्यासानंतर ते बोलत होते.


संसदेच्या नवीन इमारतीमध्ये करण्यात येणाऱ्या नवीन आधुनिक सुविधा आणि यंत्रणांमुळे खासदारांच्या क्षमताही वाढणार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. संविधानाच्या प्रस्तावनेतील शब्दांचा आधार घेऊन ‘आम्ही भारतीय एकत्रितपणे संसदेच्या नवीन इमारतीची रचना करणार आहोत. भारत जेव्हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करेल, तेव्हा ही इमारतच प्रेरणास्रोत असेल.’ असे पंतप्रधान म्हणाले.
जर देशाच्या गरजा पूर्ण करण्याचे काम संसदेच्या जुन्या इमारतीतून पूर्ण झाले असेल. तर 21 व्या शतकातील भारताच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे काम नवीन इमारतीतून होईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
कर्नाटकातील शृंगेरी मठाच्या पुरोहितांनी संसदेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन केले आणि त्यानंतर सर्वधर्म प्रार्थनाही करण्यात आली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी, नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनीही या प्रसंगी पूजा केली.







