जामनेर तालुक्यातील पळासखेडा मिराचे येथील घटना
रियानीबाई शांतीलाल बारेला (वय-३५, रा. पळासखेडा मीराचे, ता. जामनेर) असे मयत महिलेचे नाव आहे. मध्य प्रदेशातील रहिवासी असलेले बारेला कुटुंब गेल्या १० वर्षांपासून जामनेर तालुक्यातील पळासखेडा मीराचे येथील प्रकाश बाबुराव विचारे यांच्या शेतात राहत होते. (केसीएन)ते चिंचेच्या झाडाखाली झोपडी करून तिथेच शेतीचे काम करत होते. बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे त्यांच्या झोपडीच्या बाजूला असलेले चिंचेचे मोठे झाड झोपडीवर कोसळले. त्यावेळी आतमध्ये आश्रय घेऊन बसलेल्या रियानीबाई बारेला, त्यांचे पती शांतीलाल बारेला (वय-४०), मुलगा संजय शांतीलाल बारेला (वय-१५), मुलगा संदीप शांतीलाल बारेला (वय-२०) आणि भावाचा मुलगा दयाराम धरमसिंग बारेला (वय-२०) हे सर्वजण झाडाखाली दबले गेले.
या दुर्घटनेत रियानीबाई झाडाखाली दबून जागीच मरण पावल्या. तर त्यांचे पती, दोन्ही मुले आणि भावाचा मुलगा असे चौघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले.(केसीएन)जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच रियानीबाईंच्या नातेवाईकांनीही रुग्णालयात धाव घेतली आणि त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेची नोंद जामनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. बारेला कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.