धरणगाव शहरातील लोहारी गल्लीत घटना, जळगावात नातेवाईकांचा आक्रोश
धरणगाव ( प्रतिनिधी ) – येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी पद्धतीने ‘झिरो वायरमन’ म्हणून काम करणाऱ्या एका ३६ वर्षीय तरुणाचा विजेच्या खांब्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दिनांक २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिलीप देवा भिल (वय ३६, रा. गारखेडा, ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. दिलीप भिल हा गेल्या १० वर्षांपासून धरणगाव येथील महावितरण कार्यालयात ठेकेदारी तत्वावर ‘झिरो वायरमन’ म्हणून कार्यरत होता. तो आई-वडील, पत्नी आणि दोन मुलांसह गारखेडा गावात राहत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी तो महावितरणच्या कर्मचाऱ्यांसोबत धरणगाव शहरातील लोहार गल्ली परिसरामध्ये विजेच्या खांब्यावर काम करण्यासाठी गेला होता.
सकाळच्या सुमारास, सुमारे ९ वाजता दिलीप भिल खांब्यावर चढून काम करत असताना, अचानक तो जमिनीवर कोसळला. खांब्यावरून पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याच्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दिलीप याला मृत घोषित केले.
या अपघाताची माहिती मिळताच दिलीपच्या आई-वडील, पत्नी आणि नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे धाव घेतली. आपल्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच आईने केलेला मन हेलावून टाकणारा आक्रोश उपस्थितांचे डोळे पाणावणारा होता. दरम्यान, दिलीप भिल हा कुटुंबाचा एकमेव आधारस्तंभ असल्याने आणि कामावर असताना अपघात झाल्याने, मयत तरुणाच्या कुटुंबीयांना महावितरणकडून भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी एकलव्य संघटनेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही आणि ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत दिलीपचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतला होता. या संदर्भात धरणगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.