दुःखापासून बचाव करायचा असेल तर पाप कर्मांना लगाम घालावा लागतो. आपल्याला सुख अथवा दुःख हे आपल्या पाप अथवा पुण्य यामुळे प्राप्त होतात. असे असले तरी एक ध्यानात ठेवले पाहिजे या जगतात कोणतीच गोष्टी स्थायी किंवा कायम स्वरुपी नसते अगदी दुःख देखील स्थायी नसते. दुःख येते, त्यानंतर पुन्हा सुख येते. दुःख प्राप्त होऊ नये यासाठी कर्म चांगले करायला हवे म्हणजेच शुभ कर्म करणे आणि धर्माचरण करणे अत्यंत मोलाचे ठरते याबाबत शासनदीपक प. पु. सुमितमुनिजी महाराज यांनी अत्यंत मोलाचा सल्ला दिला.
आपल्याला दुःख का प्राप्त होतात याचे कारण जाणून घ्या, कुठली गोष्ट केली म्हणजे सुख प्राप्त होते याचे चिंतन करून सांगितलेल्या मार्गावर आचरण करायला हवे. एक गोष्ट आपल्या मनात कायमची खुणगाठ बांधून ठेवा की, चांगले कर्म केले तर आपल्याला त्याचे चांगलेच फळ प्राप्त होते. तुमच्या हाताने अजाणतेपणाने झालेली गोष्ट पापाची तीव्रता कमी असू शकते परंतु तुम्हाला कर्म करताना ठाऊक आहे की हे जे काही आपल्या हातून होत आहे जे होत आहे ते वाईट होत आहे मात्र अशा वेळी तुम्हाला अधिक पाप लागते. ज्ञानी अथवा अज्ञानी या दोन प्रकारच्या व्यक्तीपैकी कुणाला अधिक पाप लागू शकते याबाबत देखील महाराज त्यांनी सोदाहरण सांगितले.
आरंभी प. पु. ऋजुप्रज्ञमुनिजी म.सा. यांनी विचार व्यक्त केले. प्रवचनात त्यांनी सांगितले की, आपल्या पंचेंद्रियांना आपल्या नियंत्रणात ठेवले किंवा इंद्रीय निग्रह असेल तर ते आत्मशक्ती जागृत करणारे ठरू शकतात. पंचेंद्रियांना जिंकण्यासाठी व्यक्तीला पुरुषार्थ करावा लागतो. किती, कसे खायचे, काय आणि किती बघायचे? स्वतःच्या इच्छाशक्तींना, मनाला मुरड घालणे इत्यादी आवश्यक ठरते याबाबत महाराज त्यांनी सविस्तर सांगितले.