जळगावात मेहरूण तलावात पशुधनाची हानी
जळगाव (प्रतिनिधी) :- येथील मेहरूण तलावात पाणी पिण्यासाठी म्हशी उतरल्या होत्या. पाणी पिऊन त्या बाहेर येत असताना एक विजेच्या खांब्याचा धक्का लागल्याने तिथेच विजेचा धक्का लागून ती चिटकली व गतप्राण झाली. पशुपालकाच्या नुकसानीचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.
तांबापुर परिसरातील गवळीवाडा येथे रविंद्र पुंडलिक हटकर (वय ४०) हे परिवारासह राहतात. शनिवारी दि. २८ जून रोजी नेहमीप्रमाणे ते त्यांच्या म्हशी घेऊन मेहरूण तलाव येथे पाणी पिण्यासाठी घेऊन गेले होते.(केसीएन)तेथे पाणी पिल्यावर म्हशी बाहेर निघत होत्या. त्यातील एक म्हशीचा जवळच्या विजेच्या खांब्याला स्पर्श झाला अन तिला विजेचा जोरदार धक्का लागून ती तेथेच गतप्राण झाली. घटना पाहिल्यावर पशुपालक रविंद्र हटकर यांना अश्रू अनावर झाले. मयत म्हशीची किंमत अंदाजे सव्वा लाख रुपये आहे.
दरम्यान, जिल्हा पशुचिकित्सक अधिकारी डॉ. चोपडे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्यात आली आहे.(केसीएन)दरम्यान, २ वर्षांपूर्वीदेखील तलाव परिसरात योगेश हटकर यांच्या मालकीच्या २ म्हैस यांना विजेचा धक्का लागून मयत झाल्या आहेत. त्याबाबतची शासकीय नुकसान भरपाई अद्यापि योगेश हटकर यांना मिळालेली नाही. पशुपालकांना पशुधनाची हानी झाल्याबद्दल शासनाने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.