अमळनेर तालुक्यातील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मुंगसे येथील ३३ वर्षीय तरूणाचा शेतात बैलांसाठी चारा गवत कापत असताना विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी २४ रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंगसे सावखेडा रस्त्यावर असलेल्या शेतात ज्ञानेश्वर बापू कोळी हा दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास गुरांसाठी चारा कापत होता. ट्युबवेलच्या उघड्या विद्यूत तारेशी संपर्क आल्याने त्याला विजेचा जबर धक्का बसला. त्याला आजूबाजूच्या नागरिकांनी पुढील उपचारासाठी चोपडा येथे नेले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार बहीणी, आई वडील असा परिवार आहे. ते माजी सरपंच बापू संपत कोळी यांचे चिरंजीव होत. तरुणाचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.