पाचोरा ( प्रतिनिधी ) – भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी काल पदाधिकाऱ्यांसोबत महावितरण कार्यालयात जाऊन पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामात सक्तीची वीजबिल वसुली व कनेक्शन तोडणी तात्काळ थांबविण्यात यावी यासंदर्भात निवेदन देऊन पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी अमोल शिंदे यांनी सांगितले की जिल्ह्यासह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात खरीप हंगामात पिके शेवटच्या टप्प्यात असताना उत्पन्न शेतकऱ्यांच्या घरात येण्याच्या वेळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला.अशा परिस्थितीत सरकारने बाधित शेतकऱ्यांना सरसकट १०,००० प्रति हेक्टरप्रमाणे तुटपुंज्या स्वरूपाची मदत दिली. एकरी लागणारा मशागतीचा, बियाणे व रासायनिक खतांचा आणि मजुरीचादेखील खर्च निघाला नाही.ठाकरे सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली. आता रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मका, गहू, हरभरा, सोयाबीन, बाजरी या पिकांची लागवड केलेली आहे. शेतीसाठी पाण्याची नितांत गरज असताना सक्तीचे वीज बिल वसुली करून बिल न भरल्यास कृषीपंपाचे कनेक्शन तोडण्याचा जुलमी प्रकार पाचोरा आणि भडगाव तालुक्यात सुरु आहे , असे यावेळी अमोल शिंदे यांनी सांगितले.

आमदार किशोर पाटील यांच्यावर टीका करत ते म्हणाले की आमदार झोपेत असून त्यांना शेतकर्यांच्या समस्या का दिसत नाहीत. काही दिवसांपासून रोज शेतकरी भाजपा कार्यलयात येतात व समस्या मांडतात आमदार महोदयांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का ? शेतकऱ्यांचे विहिरीत पाणी असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणत असल्याची टीका शिंदे यांनी आमदारांवर करत महावितरणाचे कार्यकारी अभियंता रामचंद्र चव्हाण यांना निवेदन दिले सक्तीची वीजबिल वसुली व कनेक्शन तोडणे न थांबल्यास रस्त्यावर उतरून भाजपा तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला
याप्रसंगी पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष कांतीलाल जैन, शहराध्यक्ष रमेश वाणी, सरचिटणीस संजय पाटील, माजी सभापती बन्सीलाल पाटील, प्रदीप पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.







