एक महिला जखमी, भुसावळ तालुक्यातील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) – वरणगाव येथून जवळच असलेल्या सुसरी शिवारात शेतात काम करणाऱ्या शेतकरी व मजुरांवर आज दुपारी २६ रोजी वीज पडल्याने दोन महिलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एक महिला जखमी झाली असून मयत एका महिलेचा पती थोडक्यात बचावला आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुसरी गावावर शोककळा पसरली आहे.
सुसरी ता. भुसावळ येथील शेत शिवारात दुपारी दीड वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडला. आज (ता. २६ ) मंगळवार सकाळ पासुन कोरडे वातावरण असल्याने शेतकरी वर्ग मजुरांसह शेतात होते. सुसरी ता. भुसावळ येथील शेतमजूर रविंद्र सदाशिव तळेले (वय ४० ) हे मिनाक्षी रविंद्र तळेले वय (३४) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (वय ३३ ) या महिलांसह विल्हाळे शिवारातील शेतात कामे करीत होते. अचानक दुपारी दीड ते दोन वाजेच्या दरम्यान विजांच्या गर्जनांसह पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची धांदल उडाली. सोबत असलेले रविंद्र तळेले हे गुरांचे वैरण चिखलाने घाण होईल त्यामूळे ते शंभर मिटर अंतरावर बैलगाडीत वैरण टाकत होते.
अनिता उर्फ ममता पाटिल व मिनाक्षी तळेले या मजूर महिला पाऊस सुरू असतांना बैलगाडीकडे येत असतांना अचानक या महिलांवर वीज कोसळल्याने या दोन्ही महिलांचा जागीच मृत्यू झाला. तसेच शेजारील शेतात काम करणार्या वत्सलाबाई आनंदा तळेले (वय ५५ ) यांना सुध्दा जबर झटका बसल्याने त्या जखमी झाल्या आहेत. रविंद्र तळेले हे त्या महिलांपासुन काही अंतरावर असल्याने ते सुदैवाने बचावले आहेत. घटनेची माहिती पोलिस पाटिल नितिन पाटिल यांनी दिल्याने वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तर परीसरातील शेतकरी व मजूर वर्ग पुर्णतः धास्तावलेला असुन या दुःखद घटनेमुळे सुसरी गाव व मृतक माहिलांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
.
घटनेचा वरणगाव पोलीसांना पंचनामा करून दोनही मृतदेहांचे वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर विजांच्या तांडवामुळे परिसरात प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. शासनकडून आता शेतकऱ्यांच्या कुटुंबाना मदत मिळावी म्हणून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.