चाळीसगाव तालुक्यातील रामनगर येथील घटना
चाळीसगाव (प्रतिनिधी) :- विहिरीवरून पाणी भरण्याच्या कारणावरून दाम्पत्याला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून शिवीगाळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
तालुक्यातील रामनगर येथे दिलीप जाट व त्यांची पत्नी सरलाबाई जाट हे वास्तव्याला आहे. दि. २३ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांनी गावातील अर्जून पुनमचंद जाट यांच्या विहिरीवरून पाणी भरले. या कारणावरून नाराज होऊन अर्जून जाट, मंगलाबाई अर्जून जाट आणि जयेश अर्जून जाट (तिघे रा. रामनगर) यांनी शिवीगाळ करत दाम्पत्याला लोखंडी सळईने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच पुन्हा विहिरीवर पाणी भरण्यासाठी आले तर हात पाय काढून टाकेन असे बोलून जीवठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सरलाबाई जाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अर्जून पूनमचंद जाट, मंगलाबाई अर्जून जाट आणि जयेश अर्जून जाट याच्याविरोधात मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बाबासाहेब पगारे हे करीत आहे.