वावडदा ग्रामपंचायतीच्या सरपंचांना मोठा दिलासा
नाशिक ( प्रतिनिधी ) – जळगाव जिल्ह्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश नारायण वाडेकर यांच्यावर असलेले विविध आरोप आणि त्यांना सरपंच पदावरून तसेच सदस्य पदावरून काढून टाकण्याची मागणी नाशिक विभागाच्या विभागीय आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. यामुळे वाडेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांविरुद्ध विविध तक्रारींच्या आधारे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) नुसार अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. यामध्ये प्रामुख्याने विविध आरोपांचा समावेश होता. ०१ मे २०२३ च्या ग्रामसभेत वार्षिक प्रशासन अहवालास मंजुरी न घेण नोव्हेंबर २०२३ ची ग्रामसभा न घेणे. ग्रामपंचायतीचे जुने लोखंडी पाईप लिलाव न करता परस्पर विकणे आणि ती रक्कम स्वतःसाठी वापरणे. निविदा प्रक्रिया न राबवता साहित्य खरेदी करणे आणि पाणीपुरवठा साहित्य खरेदीत जास्तीचे देयक अदा करणे, असे आरोप लावण्यात आले होते.
या प्रकरणी विभागीय आयुक्तांसमोर विविध तारखांना सुनावण्या पार पडल्या. सरपंचांनी सादर केलेले पुरावे, बँकेचे उतारे आणि तांत्रिक बाबींचा विचार करून विभागीय आयुक्तांनी २ फेब्रुवारी रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
निकालात नमूद केल्यानुसार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंचांना पदावरून काढून टाकण्यासाठी केलेली विनंती फेटाळण्यात आली आहे. या निकालाचे सूचनापत्र ५ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आले असून, तसे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.









