जळगावातील घटनेने खळबळ
जळगाव (प्रतिनिधी):- शहरात मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास भरदिवसा गोळीबाराची थरारक घटना घडली. वडिलांना झालेल्या मारहाणीचा राग अनावर झाल्याने मुलाने मारहाण करणाऱ्या तिघांवर गावठी कट्ट्यातून २ राऊंड फायर केले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेमुळे शनिपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरकुल चौक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.


श्रीराम चौकातील रहिवासी रसाल राठोड (वय ४८) हे मंगळवारी दुपारी नेरीनाका स्मशानभूमीकडून जात असताना, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना अडवून मारहाण केली. या मारहाणीत राठोड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. रसाल राठोड यांनी या घटनेची माहिती तातडीने आपला मुलगा अनिल राठोड याला दिली. वडील जखमी झाल्याचे कळताच अनिल राठोड दुचाकीने घटनास्थळाकडे निघाला. घरकुल चौकात त्याला वडिलांना मारहाण करणारे तिघे संशयित बसलेले दिसले. संतापाच्या भरात अनिलने आपल्या कंबरेला असलेला गावठी कट्टा काढून त्यांच्या दिशेने दोन राऊंड फायर केले. गोळीबाराच्या या आवाजाने परिसरात एकच पळापळ झाली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस आणि एलसीबीचे (स्थानिक गुन्हे शाखा) पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटातील तीन जणांना ताब्यात घेतले आहे. प्रशांत चौधरी, हिमांशु शुक्ला, कृष्णा सूर्यवंशी, अक्षय तायडे यांच्यावर गोळीबार झाला. गोळीबार करून फरार झालेला मुख्य संशयित अनिल राठोड याचा पोलीस सध्या शोध घेत आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









