वरणगाव पोलीस स्टेशनचे यश
भुसावळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील ट्रक चोरीसह रेल्वे पुलाचे साहित्य चोरणाऱ्या संशयित आरोपींना अटक करण्यात वरणगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. एकूण ४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वेस्टर्न हॉटेलच्या जवळ साडेसहा लाखाचा पूर्ण ट्रक चोरीस गेला होता. या घटनेत पोलिसांनी २४ तासाच्या आत चक्र फिरवून संशयित आरोपीस अटक केली आहे. या घटनेमध्ये फिर्यादीच आरोपी निघाला आहे. संशयित आरोपीमध्ये फिर्यादी असलेला अरबाज खान तसलीम खान (वय २७, ट्रक चालक, रा. पाळधी), तसलीम खान अयुब खान (वय ५४, क्लीनर, रा. पाळधी), युसुफ खान आमिर खान (वय ४८, रा. जामनेर) या तिघांना अटक करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेमध्ये वरणगावजवळ रस्त्यावर रेल्वेच्या पुलाचे काम करीत असताना या ठिकाणाहून जात पाईप सेंट्रींगचे साहीत्य असा ९६ हजाराचा माल चोरीस गेल्याचे आशिष कुमार जाधवानी रा. भुसावळ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या घटनेतही पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी यश आले आहे. यात एक अल्पवयीन संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे.
भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी, पीएसआय गांगुर्डे, सोनवणे व सहकाऱ्यांनी तपासाचे चक्र फिरवून २४ तासात कारवाई करून संशयितांना अटक केली आहे.