शासनाकडून भरपाई मिळण्याची मच्छीमार सोसायटीची मागणी
जामनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील तोंडापूर परिसरातील मध्यम प्रकल्प १०० टक्के भरून वाहत असल्याने पाण्याच्या प्रवाहात मोठ्या प्रमाणात मासे वाहून गेल्याने येथील जय भवानी मच्छिमार सोसायटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी सोसायटीने केली आहे.
तोंडापूर परिसरात सतत पडणाऱ्या पावसामुळे तीन दिवसात धरण फुल्ल झाल्याने डोंगररांगांमधील लहान, मोठ्या नद्यांचे प्रवाह जोरात वाहत आहे व पाण्याचा विसर्ग सुरूच असल्याने तोंडापूर धरणात भोई बाधवांनी सोडलेले मत्स्यबीजापासून तयार झालेले मासे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील जय भवानी मच्छिमार सोसायटीच्या वतीने धरणात शेततळे करून ३ लाख रुपयांचे माशाचे बियाणे सोडण्यात आले होते.
आज माशांची वाढ झाली होती. आता मासे विक्री योग्य झाले असल्याने अचानकपणे पावसाचे प्रमाण वाढले व धरण भरल्याने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवतारामुळे भोई बाधवांचा हिरावून घेतला आहे. ५० टक्क्यावर माल धरणाच्या प्रवाहात वाहल्याने २० ते २५ लाखांचे नुकसान झाले आहे. नदीच्या प्रवाहात वाहणारे मासे नदीकाठावर असलेल्या गावकऱ्यांनी जाळ्याने पकडून खाण्याचा आनंद घेतला. दरम्यान, शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी महेंद्र भोई, चेअरमन पुंडलिक पाटील, सचिव तुळशीराम भोई, व्हाइस चेअरमन कैलास भोई, शांताराम भोई, राजू भोई आदींनी केली आहे.