पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर
मुंबई – महाराष्ट्रामध्ये कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला असून स्थानिक लोकांना मदत करण्याच्या हेतूने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक मदतीच्या संदर्भातील पॅकेज जाहीर करण्यात आले आहे
या पुरात लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते. यात नुकसानीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत केली जाईल असं सांगितलं जात होतं.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर मंत्रिमंडळात यास मान्यता देण्यात आली आहे.