जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी, भुसावळ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- जिल्ह्यातील ईव्हीएम मशीन भुसावळ तहसील कार्यालयातील सरकारी गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. दिवाळीच्या रात्री या गोडाऊनच्या छताला आग लागली होती. अधिकारी व अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली आणि पुढील अनर्थ टळला. यामुळे लाखो रुपयांच्या असलेल्या ईव्हीएम मशीन सुरक्षित आहेत. सोमवारी दि. १३ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदर घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
भुसावळ नगर परिषदेचा अग्निशामक दलाचा एक बंब कायमस्वरूपी या गोडाऊनमध्ये ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले. येत्या काळात लोकसभा व विधानसभा या होणाऱ्या निवडणुकीसाठी जळगाव जिल्ह्यासाठी नवीन ईव्हीएम मशीन आणण्यात आलेले आहे. जवळपास २० हजार ७०० या मशिनी भुसावळ तहसील कार्यालयातील शासकीय गोडाऊनमध्ये स्ट्रॉंगरूम तयार करून त्यामध्ये ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही व फायर एक्स्टींगशर लावण्यात आलेले आहे. मात्र, दि. १२ रोजी दिवाळी असल्याकारणाने व शासकीय तहसील कार्यालय हे शहराच्या मध्यवर्ती वस्तीजवळ असल्याने फटाक्यामुळे छतावर रात्री दहा वाजता आग लागलेली होती.
आग लागल्याची माहिती मिळताच भुसावळ नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला बोलाविण्यात आले. अवघ्या दहा मिनिटात ही आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, तहसीलदार नीता लबडे, उपमुख्य अधिकारी लोकेश ढाके आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. दि. १३ रोजी सकाळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळ तहसील कार्यालयात भेट दिली आणि त्याठिकाणी असलेल्या स्ट्रॉंग रूम व संपूर्ण ईव्हीएम मशीनची व सीसीटीव्ही फुटेज याची पाहणी करत या मशीनची सुस्थितीत असल्याची खात्री केली.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलविण्यात आली असून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच सदरील घटनेची माहिती रात्रीच राज्य निवडणूक आयोग व भारत निवडणूक आयोग यांच्या कार्यालयाला देण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान महसूल अग्निशामक दल, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासन यांच्याकडून ज्या ठिकाणी आग लागलेली होती त्यातील संपूर्ण अहवाल तयार करण्यात आला. सदरील ही इमारत धोकादायक आहे की नाही? याची सुद्धा पडताळणी करण्यात आली. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी कायमस्वरूपी तहसील कार्यालयात अग्निशामक बंब ठेवण्यात आलेला आहे. जिथे आग लागली होती त्या ठिकाणी नवीन ताडपत्री टाकण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी देण्यात आले आहेत.
डीपीडीसीच्या माध्यमातून पाच टक्के रक्कम स्वच्छ सुंदर कार्यालयासाठी मिळत आहे. सध्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयापासून तहसील कार्यालयापर्यंत नवीन बिल्डिंगचे कामे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेले आहेत. पायाभूत सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे. दोन ते तीन वर्षात या संपूर्ण सुविधा कार्यालयात गतिमान सरकार सत्तेत आल्यापासून स्वच्छ सुंदर संकल्पना या राज्यात आली आहे. भविष्यात कॉर्पोरेट स्टाईल कार्यालय दिसतील व हेरिटेज बिल्डिंग संवर्धन करण्याचा उद्देश या सरकारचा आहे असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.