श्रीमद भागवत कथेत दहीहंडी सोहळ्यात भाविक उत्साहित
जळगाव (प्रतिनिधी) – भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं – निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण.
स्वतःतील तेजशक्तीचा शोध म्हणजे जीवन. हे सर्व भगवान श्रीकृष्णांच्या आयुष्यात बालपणापासून दिसून येते.समर्पित भक्तिभाव व निस्वार्थ प्रेम महत्वाचे आहे. कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. कर्म करावे, त्यानुसार फळ मिळते, असे मार्गदर्शन भागवताचार्य हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी केले.
धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेले तरुण कुढापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे महानगरपालिका शाळा क्रमांक ३, पांजरापोळ परिसर या ठिकाणी दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष आहे. बुधवारी दि. २९ डिसेंबर रोजी दहीहंडी सोहळा साजरा झाला.
भगवान श्रीकृष्णाने जन्मानंतर नंदनगरीमध्ये विविध प्रकारच्या लीला केल्या. त्या लीलांचे वर्णन हभप विशालशास्त्री यांनी केले. त्याच बरोबर माखन लीला वर्णित केली. कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ नाम भगवंताचे आहे, त्याला आयुष्यात खूप महत्त्व आहे असे सांगत, भगवान श्रीकृष्णांनी अवतार घेतल्यानंतर नंदनगरी मध्ये त्याच्या मित्रांसमवेत केलेल्या विविध प्रकारचे खेळ, रासलीला याबाबत हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी माहिती दिली. संध्याकाळी दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी भाविकांनी दहीहंडी फोडताना एकच जल्लोष केला. ‘गोविंदा आला रे आला’ या गीतावर भाविकांनी ताल धरला.
जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.के.लाहोटी, शनिपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळीराम हिरे, केमिस्ट संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक अशोक सोनी, सुभाष भोई यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गुरुवार दि. ३० डिसेंबर रोजी श्रीकृष्ण रुख्मिणी स्वयंवर भागवतकथेत होणार असून त्याची महती सांगितली जाणार आहे. दुपारी १.३० वाजता भाविकांनी मनपा शाळा क्र. ३ येथे उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार यांनी केले आहे.