आत्महत्येचे कारण अस्पष्ट, विद्यार्थी हादरले
जळगाव (प्रतिनिधी) : येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृह क्रमांक ३ येथे एका अमरावती जिल्ह्यातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास उघडकीस झाली आहे. या प्रकरणी एकच खळबळ उडाली असून पाळधी दूरक्षेत्राचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार जि. अमरावती) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो विद्यापीठामध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमांक ३ येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. (केसीएन)त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. प्रतीक गोरडे याचे वडील शिरसगाव कसबा येथे मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मुलांनी वस्तीगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरती केली. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली.
काही वेळानंतर मुलं जेवणावरून परतली. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. त्यावेळी काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता. (केसीएन) या वेळेला इतर विद्यार्थी धावून आले. त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.
यानंतर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती कळताच पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी माहिती जाणून घेतली. तसेच रुग्णालयात येऊन विद्यार्थ्यांकडून आत्महत्याबाबत माहिती घेतली. दरम्यान प्रतीक गोरडे यानी आत्महत्या का केली याबाबत अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. पाळधी दूरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.