गणेशवाडी भागात तिसऱ्या दिवशी वैद्यकीय क्षेत्राकडून महाआरती
जळगाव (प्रतिनिधी) :- श्रीमद भागवत कथेने मानवाला आत्मकल्याणाचा मार्ग दाखविला आहे. या मार्गावर चालून सर्वांनी आपले जीवन सत्कर्मी लावावे. भागवत कथा म्हणजे दु:ख समूळ नष्ट करणारे अमृत आहे, असे मार्गदर्शन हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी केले.
अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिर स्थापनेच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त जळगाव शहरातील गणेशवाडी भागामध्ये श्रीदत्त मंदिर परिसरात माजी महिला व बालकल्याण सभापती मंगला चौधरी व विठोबा चौधरी यांच्यातर्फे संगीतमय भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. कथेच्या तिसऱ्या दिवशी हभप देवदत्त मोरदे महाराज यांनी कथा सुश्राव्य केली.
ते म्हणाले की, भगवंतांचे स्वरूप दर्शविण्याचे आणि भगवत तत्त्वाचा निर्देश करण्याचे काम श्रीमद भागवत करते. जी व्यक्ती भगवंताची होते तिलाही भागवत म्हणतात. श्रीमदभागवत हे संसारातील भय दुःखाचा समूळ नाश करणारे अमृत आहे. मन शुद्ध करणारे याच्यापेक्षा चांगले साधन नाही. भगवंत प्राप्तीसाठी परमात्मा संबंधातील श्रवण, मनन, चिंतन हेच प्रत्येक जीवासाठी कल्याणकारी असल्याचे प्रतिपादन मोरदे महाराज यांनी केले. महाआरती डॉ. प्रकाश महाजन, डॉ. गौरव महाजन, डॉ. राहुल महाजन, डॉ. अवधूत चौधरी, डॉ. दिलीप राणे, डॉ. तेजस राणे, डॉ. हर्षल पाटील, डॉ. तेजेंद्र चौधरी, डॉ. राहुल चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आली. उद्या दि. ९ जानेवारी रोजी गजेंद्र मोक्ष, समुद्रमंथन, श्रीराम जन्म व चरित्र मोरदे महाराज विशद करतील.