जळगाव : महालक्ष्मीचा कार्यक्रम पाहून घरी परतणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी सोन्याची पोत जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना १ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठ वाजता नंदनवन कॉलनीत घडली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदनवन कॉलनीत राहणाऱ्या उमा सतीश लाठी (वय ५८) या सोमवारी (१ सप्टेंबर) सायंकाळी आपली जाऊ आणि मुलीसोबत शेजारी राहणाऱ्या केदार देशपांडे यांच्या घरी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर त्या गल्लीत इतर महिलांसोबत बोलत उभ्या होत्या. त्यानंतर घरी परतत असताना अचानक एका दुचाकीवर दोन अज्ञात इसम त्यांच्या जवळ आले. दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने उमा लाठी यांच्या गळ्यातील अंदाजे १५ ग्रॅम वजनाची आणि ६० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत हिसकावून घेतली आणि दोन्ही चोरटे घटनास्थळावरून पळून गेले.
हा प्रकार घडताच उमा लाठी यांनी आरडाओरडा केला. आजूबाजूच्या काही लोकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यांचे वय अंदाजे २० ते २५ वर्षांच्या दरम्यान असावे, तसेच त्यांनी तोंडाला मास्क लावलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही.
या घटनेनंतर उमा लाठी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.