चाळीसगाव तालुक्यातील मन हेलावणारी घटना!
चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील शिवापूर येथे एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका दाम्पत्याने एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची वचनं घेत असतात, या दोघांनी मृत्यूच्या दारातही एकमेकांची साथ न सोडता जीवनाचा शेवट केला आहे.


भगवान पोपट जाधव (३८) आणि आशाबाई भगवान जाधव (२७) असं आत्महत्या करणाऱ्या पती-पत्नीचं नाव आहे. दोघांनी आपल्या शेतात एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. मृत जाधव दाम्पत्य हे शिवापूर शिवारातील आपल्या शेतातच वास्तव्यास होतं. भगवान जाधव हे शेतीसोबतच मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास या दोघांनी घरापासून काही अंतरावर असलेल्या उंबराच्या झाडाला एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला.
सकाळी नेहमीप्रमाणे नातेवाईक शेतात गेले असता, त्यांना झाडाला लटकलेल्या अवस्थेत हे दाम्पत्य आढळून आलं. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली उतरवून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केलं.
मृत भगवान आणि आशाबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. ही दोन्ही मुले शिक्षणासाठी सध्या बाहेरगावी राहत असल्याने या भीषण घटनेवेळी ती घरी नव्हती. आई-वडिलांच्या या टोकाच्या पावलामुळे ही दोन्ही चिमुरडी आता पोरकी झाली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलांच्या भविष्याचा विचार न करता दाम्पत्याने हे पाऊल का उचललं, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जाधव दांपत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. घरगुती वाद, आर्थिक विवंचना की अन्य काही कारण, याचा शोध पोलीस घेत आहेत. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनेचा सखोल तपास करत आहे.








