शांतता समितीच्या बैठकीत निरीक्षकांच्या उपस्थितीत निर्णय
जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील शिरसोली गावात काही महिन्यांपासून समाजकंटकांकडून शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात होता. या पार्श्ववभूमीवर गुरुवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी शांतता समितीची बैठक एमआयडीसी पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत निरीक्षक संदीप पाटील,सपोनि अनिल वाघ व अधिकारी, कर्मचारी यांचेसह शिरसोली प्र. न. चे सरपंच हिलाल भिल, शिरसोली प्र. बो. चे उपसरपंच डिगंबर बारी यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
बैठकीत पोलिसांकडून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या. ग्रामस्थांकडून सूचना व मते घेण्यात आली. तर पोलिसांना गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून दोन्ही गावात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय एकमताने दोन्ही ग्रामपंचायतींनी घेतला आहे.(केजीएन) तर गावात पोलीस चौकी बसवा तेथे आम्ही बंदोबस्त देतो या पोलिसांच्या प्रस्तावाला दोन्ही ग्रामपंचायतींनी होकार दिला असून पुढील काळात गावात पोलीस चौकीची स्थापना केली जाणार आहे. तसेच, गावातील सर्व समाजबांधवांनी एकजुटीने राहा, समजूतदारीने वागावे अशाहि सूचना पोलिसांनी दिल्या आहे. तसेच, दोन्ही गावात रात्री १० वाजेनंतर दुकाने बंद केली जातील यासाठी दुकानदारांना आवाहन केले जाणार आहे.