एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई
जळगाव (प्रतिनिधी):- शेतातील विहिरी आणि बोअरवेलवरील विजेच्या केबल चोरणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.


जळगाव तालुक्यातील लमानजन येथील शेतकरी नवल भटू गुंजाळ आणि इतर शेतकऱ्यांच्या शेतातून ३० मार्च २०२६ रोजी अज्ञात चोरट्यांनी विहिरीच्या मोटारींच्या केबल वायर चोरून नेल्या होत्या. सुमारे १९ हजार रुपये किमतीच्या या वायर चोरीला गेल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. स.पो.नि. गणेश वाघ आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने ३१ मार्च रोजी तीन संशयितांना ताब्यात घेतले. अनिल कर्तार भिल्ल (रा. नागदुली, ता. एरंडोल), संदीप सुभाष देवरे (रा. नागदुली, ता. एरंडोल), आनंदा शांताराम कोळी (रा. वाकडी, ता. जळगाव). पोलिसांनी या तिघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
त्यांच्याकडून ३ हजार रुपये किमतीची ३० मीटर लांब कॉपर वायर आणि ५ हजार रुपये किमतीचे जाळून काढलेले तांबे, असा एकूण ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, स.पो.नि. गणेश वाघ, पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे, समाधान टाकेले, किरण पाटील, कैलास पाटील आणि राहुल बोरसे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पो.हे.कॉ. ईश्वर लोखंडे करत आहेत.









