जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना
जामनेर (प्रतिनिधी) : पोळ्यासाठी तयारी करताना बैलाची शिंगे घासत असताना उधळलेल्या बैलाचा पाय नेमका शेतकऱ्याच्या गळ्यावरच पडल्याने त्यांचा पोळ्याच्या दोन दिवस आधीच शनिवारी मृत्यू झाला.
विठ्ठल भडांगे (६२ रा. पहूर कसबे ता. जामनेर) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, चार मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते अल्पभूधारक शेतकरी आहेत. शनिवारी ते नेहमी प्रमाणे बैलगाडी घेऊन शेतात गेले. तेथे त्यांनी शिंगे घासण्यासाठी बैलाचा पाय बांधला. बैलाची मान खाली करून ते शिंगे घासणी करीत होते. यादरम्यान बैल अचानक उधळला. यामुळे भडांगे जमिनीवर कोसळले. बैलाचा पाय बांधलेला असल्याने बैलाला हालचाल करता आली नाही. अशात बैलाचा एक पाय भडांगेंच्या कंठावर पडल्याने ते जागेवर गतप्राण झाले व बैल भडांगेंच्या अंगावर कोसळल्याने ते त्याखाली दबले.
शेजारील शेतकरी प्रवीण पवार, आनंदा पवार, नामदेव धनगर, रामेश्वर धनगर व सचिन धनगर हे शेतकरी येथून आपल्या घराकडे जात असताना त्यांना बैलाखाली दबलेले भडांगे दिसले. बैलाच्या गळ्यालाही फाशी लागलेली होती. फाशी मोकळी केल्यानंतर बैल वाचला पण मालकाचा दुर्दैवी अंत झाला. मुलगा समाधान व पुतण्या बाळू भडांगे यांनी त्यांना लगेचच खासगी दवाखान्यात नेले असताना डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.