विषारी औषध प्राशनाने झाला उपचारादरम्यान मृत्यू
जामनेर तालुक्यातील करमाड येथे घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) : सासरी कौटुंबिक वाद झाला आणि संतापाच्या भरात शेतकरी इसमाने विषारी औषध घेतल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दिनकर तुळशीराम पाटील (वय ४० रा. उमाळा ता. जळगाव ह.मु. कवली ता. सोयगाव) असे मयत तरूणाचे नाव आहे. दिनकर पाटील हे पत्नी व दोन मुलांसह सोयगाव जिल्ह्यातील कवली गावात वास्तव्याला होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. (केसीएन)शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. दिनकर पाटील हे गुरुवारी दि. १८ जुलै रोजी पत्नी व मुलांसोबत सासरी करमाड ता. जामनेर येथे सासरी आलेले होते. त्यावेळी पती व पत्नीत वाद झाला होता. ही माहिती दिनकर पाटील यांनी पुतण्या मनोहर पाटील याला सांगितले होते.
दरम्यान, शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी सकाळी ८ वाजता पुन्हा पतीपत्नीत वाद झाल्याने संतापाच्या भरात त्यांनी सासरी करमाड येथे विषारी औषध घेतले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. रेणुका भंगाळे यांनी तपासून सकाळी ११.३० वाजता मयत घोषित केले. या घटनेबाबत पोलीसात नोंद घेण्याचे काम सुरू होते.