कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिल्या सूचना
यावल (प्रतिनिधी) : जळगाव तालुक्यातील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पामध्ये ऑक्टोबर २०२४ पासून पाणीसाठा मोठ्या प्रमाणात होणार असल्याने शेळगाव प्रकल्प कार्यक्षेत्रातील संपादित केलेल्या जमिनीवरील पिकाचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास त्यास जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ हे जबाबदार राहणार नाही, अशी महत्त्वाची सूचना कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी दिली आहे.
तापी नदीवरील शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पात ऑक्टोबर २०२४ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. शेळगाव प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रासाठी यावल (बोरावल बु. टाकरखेडा, वाघळुद, भोरटेक, अंजाळे, पिळोदा, पाडळसे, कठोरे प्र. सावदा) भुसावळ (जोगलखेडा, भानखेडे, साकेगाव, सतारे) व जळगाव (शेळगाव, तिघ्रे, कडगाव) तालुक्यातील १५ गावांच्या जमिनी संपादीत केलेल्या आहेत.
संपादित केलेल्या जमिनीवर पिक पेरणी अथवा अतिक्रमण करु नये. तसेच ठिबक सिंचन संच, विद्युत मोटारी, तात्पुरते निवारे, गोठे आदी काढून घेण्यात यावे. शेळगाव प्रकल्पात पाणीसाठा केल्यानंतर संपादित जमिनीवरील पिकांचे अथवा बांधकामाचे नुकसान झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही, त्याची नोंद घ्यावी, असे जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता एस.आर.भोसले यांनी कळविले आहे.