जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात सोमवार दि. ५ रोजी पासून दर सोमवारी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांसाठी पोस्ट ओपीडी सुरु करण्यात आली आहे. या ओपीडीचा लाभ घेण्याचे आवाहन अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केसरीराजच्या माध्यमातून केले आहे.
कोरोना आजारातून बरे झालेल्यांचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८८ टक्कयांवर आले आहे. कोरोना मधून बरे झाल्यानंतर अनेक नागरिक हे स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करीत असतात. अनेकांना धाप लागणे, लवकर दमणे, अंगावर चट्टे उठणे आदी लक्षणे जाणवून येतात. त्यामुळे कोरोनोत्तर ओपीडी सुरु करण्यात येत आहे. येथील डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. पोस्ट कोविड ओपीडी विभागात डॉ. विनय पंचालवार, डॉ. स्वप्नील चौधरी, डॉ. एन.एस. महाजन यांची नियुक्ती अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी केली आहे.








