नागरिकांच्या सायबर सुरक्षेसाठी आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल
जळगाव (प्रतिनिधी) : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव सायबर पोलीस स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सायबर फसवणुकीच्या घटनांवर तातडीने कारवाई करण्याच्या दृष्टीने हे केंद्र २४x७ कार्यरत राहणार आहे. नागरिकांनी सायबर फसवणूक झाल्यास त्वरित १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. डिजिटल युगातील सायबर सुरक्षा ही काळाची गरज असून, नागरिकांनी सजग राहून अशा सेवा प्रभावीपणे वापराव्यात, असेही त्यांनी सांगितले.