जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) : येथील सकल धनगर समाजातर्फे आकाशवाणी चौकात आज सोमवारी दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रास्ता रोको करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
समाजाचे सुभाष सोनवणे,सदाशिव ढेकळे,वसंतराव भालेराव,अरविंद देशमुख,संदीप तेले,गणेश बागुल यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणी चौकात रास्तारोको करण्यात आला. तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. महाराष्ट्रात धनगर जमातीची ७० वर्षांपासून घटनेमध्ये असलेल्या अनुसूचित जमातीच्या अारक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे. भारत सरकारच्या दरवर्षी प्रसिध्द होणाऱ्या राजपत्रात अनुसूचित जमातीच्या यादीत अ.क्र. ३६ वर धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे.
गेल्या ७० वर्षांपासून धनगर जमात संवैधानिक हक्कापासून वंचित आहे. महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे दाखले त्वरित द्यावेत या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन करण्यात आले. पंढरपूर,लातूर,नेवासा येथे गेल्या चौदा दिवसांपासून धनगर समाज बांधव उपोषणास बसले आहेत. त्यांची त्वरित दखल घेऊन शासनाने धनगर जमातीच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीपूर्वी करावी,अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली.यावेळी महिला,पुरुषांसह नागरिक जिल्हाभरातून आंदोलनात सहभागी होते.