चोपडा शहरातील घटना
चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील ६७ वर्षीय प्रौढाला सर्पदंश झाल्यानंतर त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान या प्रौढाचा मृत्यू झाला. तर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी करुन दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे या परिसरात काही काळ तणाव होता.
शहरातील मोठा माळी वाड्यातील रहिवासी पुंडलिक गोबा माळी (वय ६७) यांना नागलवाडी शिवारात दुपारी १ वाजता शेतात काम करताना साप चावल्याने त्यांना नातेवाईकांनी चोपडा उपजिल्हा रुग्णलयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले. मात्र, काही तासातच रुग्णाचा मृत्यू झाला. या वेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सर्पदंश झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत रुग्णाच्या नातेवाईकांनी केला.
तर दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान, पुंडलिक गोबा माळी हे १ रोजी शेतात काम करत होते. काम करतांना दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना साप चावला. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांनी उपचार केले, परंतु, उपचारादरम्यान पुंडलिक माळी यांचा मृत्यू झाला.
परंतु, डॉक्टर वेळेवर आले नाहीत म्हणून माळी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नागरिकांनी करुन प्रशासनाला धारेवर धरले. या वेळी काही काळ रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतामध्ये साप निघण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात काम करीत असताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.