जळगाव तालुक्यातील बोरनार येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : बकऱ्यांचा चारा घेण्यासाठी गेलेल्या ४७ वर्षीय शेतमजूराला सर्पदंश झाल्याने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना जळगाव तालुक्यातील बोरनार गावात मंगळवारी दिनांक ९ जूलै रोजी सकाळी ८ वाजता घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संजय हिरामण पाटील (वय-४७ रा. बोरनार ता. जळगाव) असे मयत शेतमजूराचे नाव आहे. संजय पाटील हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेतमजूरी व शेळीपालनाचा व्यवसाय करून ते उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे मंगळवारी दिनांक९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता ते बकऱ्यांना चारा घेण्यासाठी गावाजवळील शेतात गेले. त्यावेळी झुडूपाजवळ चारा तोडत असतांना त्यांना संर्पदंश झाला.
त्यामुळे त्यांना गावातील ग्रामस्थांनी तातडीने खासगी वाहनातून जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.