चाळीसगाव ;- कोरोनाच्या काळात उत्पन्नाचा स्रोत ठप्प असताना याउलट रावळगाव साखर कारखान्याने उसाची देयके हे अद्यापपर्यंत उत्पादकांचे थकविलेल्या असल्याने माजी मंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन रयत क्रांती संघटच्या वतीने करण्यात आले.
रावळगाव साखर कारखान्याने शेतकरी उत्पादकांचे उसाची देयके थकवल्याची बाब आ. मंगेश चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची बैठक “”अंत्योदय जनसेवा’ कार्यालय येथे पार पडली. यावेळी बोलतांना आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ शेतकऱ्यांचे थकीत पैसे त्यांच्या खात्यात वर्ग केले नाही तर अलिबागला जाऊन तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर हळूहळू पैसे वर्ग होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी संवाद मेळाव्याचे आयोजन रयत क्रांती संघटनेच्या वतीने दुपारी १२ वा. सुमारास करण्यात आले. हि संवाद यात्रा राज्यव्यापी असून दौंड, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे वरून जळगाव याठिकाणी पोहोचली. आयोजित मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत हे बोलत होते. कोरोनाच्या काळात महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेची अंमलबजावणी या तीघाडी सरकारने योग्यरीत्या केली असती तर अनेक जण हे कर्जबाजारी झाले नसते अशी जोरदार कडाडून टीका केली.
दरम्यान शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी अविरत लढा असेच सुरू ठेवावे असे आवाहन सदाभाऊ खोत यांनी केले. यावेळी काही शेतकऱ्यांनी त्यांना भेडसावत असलेले प्रश्न उपस्थित केले. त्यावर लागलीच समाधानकारक उत्तरे हि त्यांना मिळाली. याप्रसंगी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार मंगेश चव्हाण, रयत क्रांती संघटचे जिल्हाध्यक्ष हिम्मत पाटील, तालुकाध्यक्ष अशोक पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, अजय पाटील, अनिल कोल्हे, योगेश पाटील व इतर कार्यकर्त्यांबरोबर शेतकरी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालीग्राम निकम यांनी तर आभार अशोक बाबा यांनी व्यक्त केला.