जळगाव शहरात समता नगर येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. सुकलाल नारायण गोपाळ (वय ४५) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


सुकलाल नारायण गोपाळ (मूळ रा. जवखेडे, सध्या रा. समता नगर, जळगाव) यांनी ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:१५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. ही बाब नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत सिव्हिल हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण जगदाळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.









